दि.१९| फलटण तालुक्यातील निरगुडी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधरित्या दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून गावातील युवक व्यसनाच्या गर्तेत ओढले जात आहेत. ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव असतानाही तो कागदावरच राहिला आहे, अशी ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
गावातील दारू विक्रेते फलटण शहरातील वाईन शॉपमधून दारू खरेदी करून ती चढ्या दराने गावात विकत असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर गिरवी, सासकल आणि विंचुर्णी परिसरातील तरुणदेखील निरगुडी येथे दारू सेवनासाठी येत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
यामुळे गावात सामाजिक वातावरण बिघडले असून दारूच्या नशेत शिवीगाळ, भांडणे आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी निरगुडी ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती आणि पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता. मात्र, या ठरावाला दारू विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवत पुन्हा अवैध दारू विक्री सुरू केली आहे.
याबाबत गावातील महिलांनी पोलीस उपअधीक्षकांना निवेदनही दिले होते. काही दिवस विक्री बंद राहिली, पण पुन्हा ती सुरू झाली आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांवर कोणाचा वरदहस्त आहे का, कि दारु विक्रेत्यांचे कोणाला हप्ते सुरू आहेत की काय? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
आता राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि फलटण ग्रामीण पोलीस प्रशासन यांच्याकडून या गैरप्रकारावर ठोस कारवाई होणार का,याकडे लक्ष लागले आहे.


























