पुणे, दि. 26 सप्टेंबर : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आसमंत बेनेव्हलस या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सागरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जागतिक पर्यटन दिन देखील उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या आवारात फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी “जबाबदार पर्यटन” या विषयावर पथनाट्य सादर केले. प्रवासादरम्यान पर्यावरण संवर्धन, स्थानिक संस्कृतीचा आदर, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शाश्वत पर्यटनाचे तत्त्व अंगीकारणे या महत्त्वपूर्ण मुद्यांवर प्रभावी संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.
आसमंत बेनेव्हलस ही संस्था समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात सक्रिय असून, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध कार्यक्रम सातत्याने आयोजित करत आहे. या संस्थेच्या सहकार्यामुळे सागरी महोत्सवास व्यापक सामाजिक स्वरूप लाभले.
पथनाट्याला विभागीय पर्यटन कार्यालयातील शासकीय कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवक स्वयंसेवकांच्या कलात्मक सादरीकरणाचे तसेच जबाबदार पर्यटन या महत्त्वपूर्ण विषयाचे उपस्थितांनी कौतुक केले.
पर्यटन संचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले की, जबाबदार पर्यटन ही केवळ प्रवासाची संकल्पना नसून पर्यावरणपूरक व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रवासाची जीवनशैली आहे. प्रवास करताना कचरा न टाकणे, स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या सेवा वापरणे, स्थानिक संस्कृती व परंपरा जपणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे हे जबाबदार पर्यटनाचे गाभ्याचे तत्त्व आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून सागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन या दोन्ही कार्यक्रमांचे औचित्य साधत, समाजात पर्यटनाच्या जबाबदार दृष्टीकोनाचा संदेश पोहोचविण्यात आला.


























