वडजलच्या बाळासाहेब अडसूळ यांना राज्यस्तरीय ‘कृषी उत्कर्ष सामाजिक पुरस्कार’ प्रदान
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण
फलटण तालुक्यातील वडजल येथील प्रगतशील शेतकरी तथा कृषी भूषण बाळासाहेब अडसूळ यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वाई येथील उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ‘कृषी उत्कर्ष सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सेंद्रिय शेती, ऊस प्रक्रिया उद्योग आणि विविध कृषी संशोधनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
बाळासाहेब अडसूळ यांनी “स्वीटकेन सेंद्रिय शेती उत्पादन व प्रक्रिया केंद्र” या माध्यमातून ऊस आणि उसापासून तयार होणाऱ्या विविध सेंद्रिय उत्पादनांवर सातत्याने संशोधन करत कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक संशोधनाची जोड देत त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले केले आहेत. विशेष म्हणजे सेंद्रिय उत्पादनांच्या निर्मितीतून ग्राहकांना आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
अडसूळ यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गूळ, काकवी, लापशी, कुल्फी, सेंद्रिय चहा तसेच इतर अनेक कृषी प्रक्रिया उत्पादने बाजारात लोकप्रिय ठरत आहेत. त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीमुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धित उत्पादनांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि दर्जेदार सेंद्रिय उत्पादने तयार करण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
फलटण कृषी विभागाकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच सेंद्रिय शेतीत अनेक प्रयोग यशस्वीपणे करता आल्याचे अडसूळ यांनी सांगितले. कृषी विभागाच्या सहकार्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि सेंद्रिय शेती पद्धतींचा योग्य वापर करता आला, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बाळासाहेब अडसूळ यांना राज्यस्तरीय कृषी उत्कर्ष पुरस्कार जाहीर होताच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक किरण राऊत, अशोकराव जाधव तसेच प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी अडसूळ यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय उत्पादन आणि संशोधन याकडे वळण्याची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. बाळासाहेब अडसूळ यांचे कार्य हे नव्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या यशामुळे फलटण तालुक्याच्या कृषी क्षेत्राची राज्यभरात सकारात्मक ओळख निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


























