सातारा :”स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी…” असे अभिमानाने सांगणारी भारतीय संस्कृती. मात्र काँग्रेसची विचारधारा ही कायम विष पेरणारी आणि नारीशक्तीचा अवमान करणारीच राहिली आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरणे, इतकेच नाही तर वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा देशातील समस्त मातृशक्तीचा घोर अपमान आहे. मातृशक्ती हे कधीही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शिवतीर्थ येथे घेण्यात आलेल्या या आक्रमक आंदोलनात काँग्रेस नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. बिहार निवडणुकीत मोदीजींविषयी बोलण्यास काँग्रेसला मुद्दे न मिळाल्याने मातृशक्तीचा अपमान करून वैयक्तिक स्तरावर राजकारण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. चित्रलेखाताई माने-कदम म्हणाल्या की, “भारतीय संस्कृतीत मातृशक्तीचे पूजन केले जाते. पंतप्रधान मोदीजींच्या आईविषयी केलेले वक्तव्य हे अत्यंत लज्जास्पद असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो.”
प्रदेश सचिव सुनिशा शहा यांनी निषेधार्थ काँग्रेसविरोधात “मुर्दाबाद” च्या घोषणा दिल्या. तसेच “ए.आय.चा योग्य वापर झाला तर वरदान, अन्यथा शाप आहे. सर्वांची माता एकसमान असून त्यात भेदभाव करणे ही गंभीर चूक आहे” असे मत व्यक्त केले.सातारा भाजपा शहराध्यक्ष वैशाली टंगसाळे यांनीही काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
या आंदोलनात महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, उपाध्यक्ष सविता पवार, शहराध्यक्ष रिना भणगे, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वनिता पवार, शहराध्यक्ष गौरी गुरव, रोहीणी क्षीरसागर, संगीता जाधव, सीता चव्हाण, सुरेखा इंगवले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
























