सातारा
प्रतिनिधी | जिहे (ता. सातारा) येथील होलार समाजातील गोरे कुटुंबावर गावातील उच्चवर्णीय समाजाकडून मारहाण झाल्याची घटना घडली असून या घटनेचा रिपाई ए आणि दलित महासंघ यांच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संबंधितावर तात्काळ अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या दहा वर्षांपासून जिहे गावात वास्तव्य करणाऱ्या गोरे कुटुंबाने त्यांच्या खाजगी जागेत दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली होती. या ठिकाणी ते दरवर्षी पूजा-अर्चा करीत होते. यंदा गावात देवीची दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील उच्चवर्णीय गटाने चिडून सागर हणमंत गोरे व त्यांचे वडील हणमंत गोरे यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले असून इतर कुटुंबीयांना देखील धमकावण्यात आले. घडलेल्या प्रकारानंतर गोरे कुटुंबीयांनी पोलिसांना संपर्क साधला मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. गोरे कुटुंब उच्चशिक्षित असून बी.कॉम पदवीधर आहे. तरीही जातीय पूर्वग्रहातून त्यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. अशा घटना अत्यंत निंदनीय असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार संबंधितांवर तातडीने अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना रिपाई एचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, रासपचे सातारा लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, संदीप माने, रघुनाथ सकट, सागर मोरे, मृणाल गोरे, विशाल माने, रेखा गोरे, हणमंत माने, अशोक माने, दादा माने, हनुमंत मोरे, सागर फाळके, विनोद ओव्हाळ, मदन खंकाळ, किरण ओव्हाळ आदी उपस्थित होते.


























