गिरवी नाका परिसरात हरवलेले दहा हजारांचे पाकीट शालेय विद्यार्थ्यांनी परत केले; प्रामाणिकपणाचे फलटणभर कौतुक
फलटण दि.०७| फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात संतोष सुधाकर जाधव (रा. निरगुडी) यांचे दहा हजार रुपये असलेले पाकीट हरवले होते. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे पाकीट सापडल्याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र, शालेय स्तरावर शिक्षण घेत असलेल्या काही संवेदनशील विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणामुळे हे पाकीट सुखरूप त्यांच्या हातावर आले.
गिरवी नाका परिसरात हे पाकीट आदित्य नरसिंह जगताप, धीरज पंढरीनाथ पाटील, विशाल रमेश कदम आणि प्रतीक संतोष लकडे या विद्यार्थ्यांना आढळले. पाकिटात मोठी रक्कम असूनही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या विद्यार्थ्यांनी मानवतेच्या भावनेतून त्वरित संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधून पाकीट परत केले.
विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक कृतीचे फलटण परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. समाजात माणुसकी, नैतिकता आणि सद्भावना अजूनही जिवंत असल्याचे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
संतोष जाधव व निलेश तावरे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “आजच्या पिढीत अशी प्रामाणिकता पाहून समाधान वाटते,” असे त्यांनी सांगितले.
ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून विद्यार्थ्यांनी दाखवलेली माणुसकी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.


























