फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.
शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षे जपून वाढवलेल्या या झाडांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी उन्हाळ्यात टँकर व बादल्यांद्वारे पाणी घालून संवर्धन केले होते. अशा झाडांची तोड झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, स्थानिकांच्या मते पूर्ण दहा वर्षे वाढलेली झाडे तोडणे हे अनाकलनीय आहे .या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरूनही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
पर्यावरणप्रेमींनी काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध असताना झाडांनी भरलेलीच जागा का निवडली? झाडे तोडताना सर्व नियमांचे पालन झाले का? प्रतिपूरक वृक्षारोपणाची ठोस योजना काय आहे? या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल विचारले जात आहेत.
एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात असल्याने प्रशासनाची दुहेरी भूमिका उघड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. झाडे लावण्यापेक्षा ती जपणे अधिक महत्त्वाचे असून, फलटणमधील ही घटना पर्यावरण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.


























