खा. संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; शिवीगाळ प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | फलटण
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या आक्रमक वर्तनामुळे राज्याच्या राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. माध्यम प्रतिनिधींना उघडपणे धमक्या देणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे आणि “माझ्या नादाला लागू नका, मी पाच लोकांना ठार मारलंय” असे धक्कादायक वक्तव्य केल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकारांनी एका राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संजय दिना पाटील यांच्याशी संवाद साधला होता. सुरुवातीला काही मिनिटे त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली; मात्र त्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. पत्रकारांनी सातत्याने प्रश्न विचारल्याने ते संतप्त झाले आणि त्यांनी माध्यम प्रतिनिधींना धमकावत अर्वाच्य भाषेचा वापर केला.
“मी तुमच्याशी दोन मिनिटं बोललो ना… आता अति करताय. बंद करा, नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे. इज्जत करतोय, इज्जत करा. उगीच डोक्यात जाऊ नका. परत आलात तर मारून पाठवेन. जे लिहायचं ते लिहा. रेकॉर्ड करा आणि आयुक्तांकडे तक्रार करा,” असे म्हणत त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली.
इतकेच नव्हे, तर “आता माझ्याकडे पुन्हा आलात तर मार खाणार. हे रेकॉर्ड करून ठेवा. पोलिसांसमोरही सांगतोय. काय तक्रार करायची ती करा,” अशी थेट धमकी त्यांनी दिल्याचे समोर आले आहे. या वक्तव्यामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
यापूर्वी “मी पाच लोकांना ठार मारलंय” असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे गंभीर दावा केल्याची चर्चा रंगली होती. या विधानामुळेही अनेक प्रश्न उपस्थित होत असून, त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले संजय दिना पाटील सध्या सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय दिना पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून, पत्रकारांबाबत त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी संजय दिना पाटील यांना पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितल्याचेही स्पष्ट केले.
याचप्रमाणे मंत्री संजय शिरसाट यांनीदेखील या घटनेबाबत प्रतिक्रिया देत, “संजय दिना पाटील यांच्या वतीने आम्ही पत्रकारांची माफी मागतो,” असे सांगितले.
या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना धमकावणे व शिवीगाळ करणे कोणत्याही लोकप्रतिनिधीस शोभणारे नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी योग्य ती दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणीही विविध स्तरांतून होत आहे.


























