भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटणतर्फे यशोदा गोपालन गोशाळेत चारा दान व फळवाटप
सेंद्रिय शेती व गौसेवा यांचा संदेश
फलटण :
भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत यशोदा समृद्ध गोपालन, फलटण येथील गोशाळेला चाऱ्याचे दान आणि गाईंना फळांचे वाटप करण्यात आले. महावीरांच्या अहिंसा, करुणा व सर्व जीवांप्रती दयाभाव या संदेशाला अनुसरून हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
या प्रसंगी जैन सोशल ग्रुपतर्फे “गाय वाचविण्याचे पुण्य अत्यंत महान आहे आणि गाईची सेवा हीच ईश्वर सेवा” असा संदेश देण्यात आला. तसेच फलटणमध्ये गाईंसाठी मोठ्या प्रमाणावर शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने यशोदा गोशाळेचे विस्तारीकरण करण्याबाबत नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
ग्रुप सदस्यांनी सांगितले की, पुढील काळात फलटणमध्ये एकाच छताखाली अधिक गाईंना सुरक्षित निवारा देऊन सेंद्रिय शेती, शेणखत आणि केमिकलमुक्त शेती या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे. पर्यावरण, शेती आणि पशुसंवर्धन या तिन्ही क्षेत्रांच्या संवर्धनासाठी गौसेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाबद्दल यशोदा समृद्ध गोपालन गोशाळेचे संचालक सौरभ सुनील सोनवले यांनी जैन सोशल ग्रुप फलटण यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “समाजातील अशा सकारात्मक उपक्रमांमुळे गोशाळेच्या कार्याला अधिक बळ मिळते व गाईंना आवश्यक सेवा पुरविणे सुलभ होते.”
उपक्रमामुळे परिसरात समाधानाचा भाव पसरला असून महावीर जयंतीचे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


























