सातारा, प्रतिनिधी प्रतापसिंहनगर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी खेड ग्रामपंचायतीवर गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचा आरोप करत ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रतापसिंहनगर येथून निघून थेट खेड ग्रामपंचायत कार्यालयावर दाखल होणार आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाचे काम न करता त्यासाठी आलेला निधी हडप करण्यात आला. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम प्रत्यक्षात झालेले नसताना लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांची कामे इतर योजनेतून पूर्ण झालेली असतानाही खेड ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून कामे दाखवून बिले काढली. जिल्हा परिषद शाळेसाठी डिजिटल साहित्य खरेदीच्या नावाखाली देखील लाखो रुपयांचा निधी वाया घालवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, १५ व्या वित्त आयोग व ग्रामनिधीतून झालेल्या विकासकामांमध्ये तसेच साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागासवर्गीयांसाठी राखीव १५ टक्के अनुदान निधी खर्च करण्यात आलेला नाही. मासिक सभा आणि ग्रामसभेत प्रतापसिंहनगरातील विकासाच्या प्रश्नांवर चर्चा झाली असतानाही सरपंच मुद्दामून या वस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गायरान जमिनीबाबत ग्रामसभा घेऊन निर्णय घेणे बंधनकारक असतानाही आजअखेर ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. रमाई घरकुल योजनेसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेले नाहीत. इतकेच नव्हे तर सरपंचांच्या पतींकडून ग्रामपंचायतीच्या कामकाजात सतत हस्तक्षेप होत असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रतापसिंहनगरातील नागरिकांना तुच्छतेची वागणूक देण्यात येत असून मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणण्यात आली आहे. त्यामुळे सरपंचांवर अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मोर्चादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरपंचांवर राहील, असा इशाराही देण्यात आला


























