पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण :
पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात फलटण येथे भारतीय पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी जोरदार निदर्शने करत खासदार पाटील यांचा जाहीर निषेध नोंदविला तसेच घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.
भारतीय पत्रकार संघ, सातारा विभागाच्या वतीने फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनतेपर्यंत सत्य माहिती पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. अशा परिस्थितीत एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांना धमकावणे व अपमानास्पद भाषा वापरणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र पत्रकारिता आणि संविधानिक मूल्यांवर थेट आघात करणारे कृत्य आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष झाल्यास पत्रकारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊन समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो.
भारतीय पत्रकार संघाने संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून लागू असलेल्या कायद्यांनुसार खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने या निवेदनाची अधिकृत नोंद घेऊन करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे,प महाराष्ट्र अध्यक्ष संदीपकुमार जाधव, कार्याध्यक्ष राजाभाऊ बोन्द्रे,तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे, विक्रम चोरमले, योगेश गंगतिरे, पोपटराव मिंड, गणेश भोईटे, सागर चव्हाण, प्रशांत सोनवणे, आप्पासाहेब तांबे, जुबेर कोतवाल, शेखर करचे, हिंदुराव गायकवाड, महादेव गायकवाड, अतुल मोरे, प्रमोद सस्ते आदी पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पत्रकारांवरील दडपशाही बंद करा”, “लोकशाहीचा चौथा स्तंभ अबाधित ठेवा”, “पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही भारतीय पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.


























