फलटणमध्ये आयोजित शिवसेना मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त एमआयडीसी, रोजगारनिर्मिती आणि आगामी राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. विशेष म्हणजे, “श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आमदार करा” या घोषणांनी सभागृह दणाणून गेले असून, ही लोकभावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
फलटण येथे पार पडलेल्या भव्य शिवसेना मेळाव्यात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अतिरिक्त एमआयडीसी उभारणीसाठी शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही. “शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य मोबदला देऊनच एमआयडीसी उभी केली जाईल. शेतकऱ्यांच्या हिताला कुठलाही धक्का लागणार नाही,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी फलटण औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, मॅग्नेशिया कंपनीच्या विस्तारासाठी येत्या महिनाभरात एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अतिरिक्त एमआयडीसी मंजुरीसाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
शिवसेना संघटनाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “एका लोकसभा मतदारसंघात तब्बल १६ हजार ५०० पदाधिकारी तयार करणारा शिवसेना हा राज्यातील एकमेव पक्ष ठरेल.” शाखाप्रमुख हा शिवसेनेचा कणा असून, त्याने पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शाखाप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाषणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांकडून “श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आमदार करा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “जे माझ्या हातात नाही त्याची जबाबदारी मी घेणार नाही. मात्र, फलटणकरांची ही लोकभावना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी आणि माजी खासदार राहुल शेवाळे स्वीकारत आहोत.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जोरदार प्रतिसाद दिला.
मेळाव्याला राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, माजी खासदार राहुल शेवाळे, चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि फलटण नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फलटण तालुक्यातील औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि आगामी विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा विशेष चर्चेचा विषय ठरला असून, श्रीमंत संजीवराजेंबाबत व्यक्त झालेली लोकभावना आगामी राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


























