सातारा, दि. 23 सप्टेंबर –मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असून, या काळात झालेल्या कामाचे मुल्यमापन होणार आहे.
या अभियानामध्ये एकूण 100 गुणांपैकी 08 गुण ग्रामपंचायतीच्या कर वसुली, गाळा व दुकान भाडे आदी स्रोतांच्या वसुलीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी डिजिटल पद्धतीने कर भरावा यासाठी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये QR Code सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल भरण्यालाही स्वतंत्र गुण देण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींसोबत नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, करदात्याने 30 सप्टेंबर 2025 पूर्वी संपूर्ण कर भरला असल्यास त्याला कराच्या रकमेवर 5 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वर्षाचा कर शक्यतो QR Code च्या माध्यमातून तातडीने भरावा, असे आवाहन जिल्हा परिषद सातारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राहुल देसाई यांनी केले आहे.


























