“स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यभर वीज ग्राहकांच्या घरातील कार्यरत मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून यासाठी ग्राहकांना संदेशही पाठविले जात आहेत. मात्र, स्मार्ट मीटरबाबत देशभरात आक्षेप व विरोध नोंदविण्यात आला असून त्यासंदर्भातील शासनाच्या धोरणांबाबत स्पष्टता नसताना ही मोहीम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संसद व राज्य शासनाकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सक्तीचा कोणताही आदेश नसल्याचे सांगत संबंधित अधिकारी कोणत्या अधिकाराखाली ही मोहीम राबवत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यातील विविध महावितरण कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेले स्मार्ट मीटर तात्पुरते जप्त करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून शासनाच्या स्पष्ट आदेशाशिवाय त्यांची बसवणी होणार नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटू) दखल घ्यावी तसेच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी केली आहे. यावेळी सौ. रेश्मा पठाण या उपस्थित होत्या.
टीप : वरील बातमी ही ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी केलेल्या निवेदनातील दाव्यांवर आधारित असून त्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.


























