सातारा दि.२९| फलटण–दहिवडी मार्गावरील अहमदनगर–फलटण–सांगली राष्ट्रीय महामार्ग (क्र. 160) चे काम शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून न्याय मिळवून देण्याचा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
कोळकी ते दुधेबावी या मार्गावरील गावातील शेतकरी मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कामाबाबत अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता आणि योग्य मोबदला न देता संबंधित विभागाने रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या शेतकऱ्यांनी नुकतेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, असा शब्द रामराजेंनी त्या वेळी शेतकऱ्यांना दिला होता.
त्याच अनुषंगाने आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट दिली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न व अडचणी सविस्तर मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक ती माहिती घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी बोलताना आमदार श्रीमंत रामराजे म्हणाले, “राष्ट्रीय महामार्गाचे काम महत्त्वाचे असले तरी त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू करणे हा अन्याय आहे. याबाबत मी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.”
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा निघावा, यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकरी समाधानी झाले असून आता सर्वांचे लक्ष आगामी मंत्र्यांच्या बैठकीकडे लागले आहे.


























