फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
फलटण
विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकरी दिंडीवर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात कथित लूटमार व मारहाणीची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे–पंढरपूर महामार्गावरील वडजलजवळील काशीदवाडी फाट्याच्या परिसरात ५ जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली. या हल्ल्यात दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडवणी (जि. बीड) येथील वारकरी दिंडी पंढरपूरहून आळंदीकडे प्रवास करत असताना काशीदवाडी फाट्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती व जेवणासाठी थांबली होती. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी दिंडीवर हल्ला करून दगडफेक केली व दिंडी चालक त्रिंम्बक कोळेकर यांना मारहाण केली तसेच सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.
घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. उलट, “इथून निघून जा, गाडीची हवा सोडली असती तर काय झाले असते,” अशा प्रकारची भीती दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतरही दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांनी वारीचा प्रवास सुरू ठेवला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वारकरी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“आम्ही विठुरायाच्या नामस्मरणात वारी करत होतो. कोणाशीही वैर नव्हते. पण आमच्यावर अचानक हल्ला झाला. माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. आमच्याकडील पैसेही घेऊन गेले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुढे यावे आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,”
त्रिंबक कोळेकर
दिंडी चालक
वडवणी जि बीड
या घटनेबाबत भीतीपोटी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वारकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.
संतांच्या महाराष्ट्रात वारकऱ्यांनाच सुरक्षिततेची भीती वाटत असेल, तर ही राज्याच्या सांस्कृतिक परंपरेसाठी चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी, तसेच भविष्यात वारकरी दिंड्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.


























