फलटण (प्रतिनिधी) दि.१७|निरगुडी गावात रस्त्याचे काम सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांना कोणतीही सूचना न दिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराने पाइपलाईन तोडण्याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र, ग्रामपंचायतीमार्फत ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घरात साठवलेले पाणी संपवले असून, सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे, तर पाणी विकत आणण्याची वेळही आली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे गावकऱ्यांचा संताप उसळला असून, प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या निष्काळजीपणाचा नागरिकांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. तातडीने पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


























