खटाव (प्रतिनिधी) दि.०९ | भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड व निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध करत खटाव तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेला हा हल्ला म्हणजे देशाच्या लोकशाही व संविधानावरच थेट हल्ला असल्याचे नमूद करण्यात आले. लोकशाही मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या अशा घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, या हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका नेते व खादी ग्रामोद्योग मंडळ संचालक मा. गणेश भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश नेत्या गौतमी मसणे, मार्केट कमिटी संचालक शैलेंद्र वाघमारे, अॅड. शुभम नलवडे, पँथर ग्रुप अध्यक्ष भगवान मोरे, गणेश यादव, रामचंद्र निकाळजे, सुनिल मिसाळ, जयपाल डावरे, जितेंद्र डावरे, मोहन नलवडे, विठ्ठल नलवडे, युवराज रणदिवे, तुकाराम बनसोडे, संभाजी बनसोडे, सुर्यकांत बनसोडे, मारुती चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याने तिच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या कृतींविरुद्ध समाजातील प्रत्येक नागरिकाने आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.
प्रशासनाकडून या घटनेतील आरोपींवर तात्काळ कडक कारवाई न झाल्यास संविधानप्रेमी कार्यकर्ते तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
























