फलटण तालुका | निरगुडी गावात गेल्या महिनाभरापासून कावीळ या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असून, गावातील गोरे आळी (महात्मा फुले नगर) परिसरात तब्बल दहा ते बारा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार सचिन पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर आमदार पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ सर्व शासकीय यंत्रणांना याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेची तत्काळ तपासणी करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीतर्फे पूर्वी दिले जाणारे मेडिक्लोअर पुन्हा सुरू करून प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. ही मागणी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सादर केल्यानंतर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.
पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासणीसाठी खंडाळा प्रयोगशाळेत पाठवले असून अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोंडके यांनी दिली.
या वेळी देवराज गोरे, लहु गोरे, अजित गोरे, अभिजित गोरे आदी उपस्थित होते.


























