पुणे दि.०७| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’ प्रसंगी “हास्य-विनोदातून समाजप्रबोधन” या विषयावर बोलताना प्रसिद्ध सिने अभिनेते आणि ज्येष्ठ कलाकार गजानन पातुरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे होते.
आपल्या व्याख्यानात गजानन पातुरकर म्हणाले की, “आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या युगात माणूस हसणे विसरला आहे. परंतु, हसण्यामुळे केवळ मन प्रसन्न राहत नाही, तर शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. विनोदाच्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट लोकांच्या काळजाला लवकर भिडते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन घडते.” त्यांनी पुढे नमूद केले की, पुस्तकाचे प्रत्येक पान माणसाचे चारित्र्य घडवते, त्यामुळे वाचनात आणि अभ्यासात आनंद शोधणे गरजेचे आहे. पोटभर हसा, पोटभर पाणी प्या, मनापासून प्रत्येकाला दाद द्या, मनापासून टाळ्या वाजवा. वाचनात, शिक्षणात, जगण्यात प्रत्येक गोष्टीत आनंद आहे. प्रत्येक गोष्ट टिपणं महत्त्वाचं आहे. पुस्तकाचे पान आपल्या जीवनाचे चारित्र्य बदलत असते.
अध्यक्षीय मनोगत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी स्पष्ट केले की, दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव विसरून हसून-हसवून जगल्यास आयुष्य अधिक सुंदर होते. दैनंदिन जीवनात आपल्याला आनंद फुलवता आला पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभ्यासासाठी आनंदमय वातावरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप लांडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जगदीश शेवते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. माऊली कोंडे यांनी मानले. प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ.रोहिदास ढाकणे, ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.जाधवर दयानंद, प्रा. माऊली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.अंकिता महांगरे, सुमित कांबळे, अभिषेक मोरे इ. तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























