फलटण (प्रतिनिधी) –फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू गावात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू धंद्यावर छापा टाकण्यात आल्याची चर्चा असून, या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त झाल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे, तर दारू विक्रेत्याला मारहाणही करण्यात आली. मात्र या घटनेची नोंद कोणत्याही पोलिस ठाण्यात नसल्यामुळे कारवाई खरेच पोलिसांनी केली की तोतया पोलिसांनी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गावातील सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सायरन व अंबर दिवा लावलेली गाडी आसू गावच्या मुख्य चौकात पोहोचली. गाडीतून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट दारू विक्रेत्याच्या घरी छापा घातला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू व संबंधित साहित्य जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावेळी विक्रेत्यास मारहाण करून कारवाई करण्यात आली.
परंतु या प्रकरणात कोणतेही अधिकृत कागदोपत्री कामकाज झालेले नाही. फलटण ग्रामीण पोलिस व बरड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, “आम्ही अशी कोणतीही कारवाई केलेली नाही, तसेच या संदर्भात गुन्हा नोंदवलेला नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गावात पोहोचलेली अंबर दिवा लावलेली गाडी नेमकी कोणाची होती? आणि कारवाई करणारे खरे अधिकारी होते की तोतया पोलिस, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, आसू, पवारवाडी, हणमंतवाडी, गुणवरे या भागात हातभट्टीच्या दारूचा धंदा बेधडक सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली. कमी दरातील दारू व त्यातून मिळणारा बक्कळ नफा यामुळे विक्रेत्यांना कोणाचीही भीती नाही. उलट संबंधित विभाग गप्प बसल्याची चर्चा सुरू असून, प्रत्येक महिन्यात छापे मारणारी ही गाडी कोणाच्या आश्रयाने काम करते, हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
गणेशोत्सवात अशा कारवाया समोर येत असल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, खरे तर अधिकृत कारवाई झाली की तोतया पोलिसांनी धमकावून कारभार केला, याचा शोध घेणे गरजेचे ठरत आहे.


























