फलटणच्या पृथ्वी चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी ; नागरिक हैराण
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
फलटण : शहरातील पृथ्वी चौक ते शिंगणापूर रोड परिसरात आज सायंकाळी वाहतुकीची भीषण कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्यावर अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते.
चारचाकी, दुचाकी तसेच बस वाहने एकाच वेळी रस्त्यावर अडकून पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पृथ्वी चौक परिसरात तुडुंब गर्दी झाल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले होते. काही वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने वाहने घातल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक, व्यापारी तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पृथ्वी चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करावेत, तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


























