राजे गटाला धक्का; समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोईटे व सामाजिक कार्यकर्ते रमण भोईटे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, प्रतिनिधी : फलटणच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोईटे आणि सामाजिक कार्यकर्ते रमण भोईटे यांनी राजे गटाची साथ सोडत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे फलटणच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेशावेळी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक संदीप चोरमले, मिलिंद नेवसे, नगरसेवक सचिन अहिवळे तसेच ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश भोईटे हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमुळे फलटणमध्ये परिचित नाव आहे. समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वारकरी सेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, जनजागृती अभियान, सामाजिक उपक्रम तसेच गरजू नागरिकांना विविध प्रकारची मदत करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. रमण भोईटे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकहिताचे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश भोईटे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर श्रद्धा व्यक्त करत आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. समाजातील सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा आमचा संकल्प आहे. समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेले समाजसेवेचे कार्य यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील.”
यावेळी रमण भोईटे यांनीही सामाजिक एकात्मता, विकास आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी भाजपच्या माध्यमातून अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दोघांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. समाजात सक्रियपणे काम करणारे कार्यकर्ते पक्षात दाखल झाल्याने भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गणेश भोईटे आणि रमण भोईटे यांच्या पक्षप्रवेशामुळे फलटण शहर आणि तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व युवक भाजपकडे आकर्षित होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची चिन्हे दिसत असून, भाजपची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाल्याची चर्चा सुरू आहे.
समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देणे, सामाजिक एकोपा वाढविणे, युवकांना सकारात्मक दिशा देणे, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि जनजागृतीच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देणे तसेच समाजहिताची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने कार्य सुरू राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


























