फलटण दि.२४| फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास निष्पक्षपाती व्हावा म्हणून तो CBI कडे वर्ग करावा, अशी ठाम मागणी वैभव गीते (नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस) यांनी केली आहे.
गीते यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
या प्रकरणातील प्रमुख आरोपी पी.एस.आय. गोपाळ बदणे, प्रशांत बनकर आणि इतर सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी. आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. तसेच अटक होईपर्यंत आरोपींच्या हालचालींची तपासणी दोन शासकीय पंचनाम्यांद्वारे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तपासात निष्पक्षता राहावी यासाठी हा तपास CBI कडे वर्ग करण्यात यावा, कारण आरोपी स्वतः फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत असल्यामुळे तपासावर प्रभाव पडू शकतो, असे गीते यांनी म्हटले आहे.
तसेच, घटनास्थळाचा फॉरेन्सिक तपास, व्हिडिओ पंचनामा, सर्व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याचे गीते यांनी नमूद केले. डॉ. मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या मजकुरात त्यांच्यावर चार वेळा बलात्कार झाल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे केवळ आत्महत्येचे कलम न लावता बलात्कारासह इतर गंभीर कलमे जोडावीत, तसेच आरोपींची नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
मयत डॉक्टर मुंडे यांच्या मोबाइल तसेच आरोपींच्या मोबाइलमधील सीडीआर, एसडीआर आणि सोशल मीडिया चॅट्सची तपासणी करून डिलीट केलेले पुरावे पुन्हा मिळवावेत, अशीही मागणी आहे. यापूर्वी डॉक्टर मुंडे यांनी केलेल्या तक्रारी, अर्ज यांची तपासात नोंद घ्यावी आणि योग्य दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गीते यांनी केली.
तसेच, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल आणि डॉक्टर मुंडे यांनी दिलेले एम.एल.सी. रिपोर्ट तपासून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता का, याबाबतही चौकशी करण्यात यावी. पंचनामे करताना फक्त शासकीय पंच ठेवावेत आणि ते फलटण तालुक्याबाहेरील असावेत, अशी मागणीही गीते यांनी केली आहे.
या प्रकरणाचा फास्टट्रॅक न्यायालयात जलदगतीने निकाल लावण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश द्यावेत तसेच विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेवटी, जर आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर सर्व सामाजिक संघटना आणि नागरिक फलटण दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा वैभव गीते यांनी दिला आहे.


























