फलटण ता. २१ ऑगस्ट |राज्यभरातील शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही फलटण तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, निरगुडी येथील काही विद्यार्थ्यांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केली आहे.
महेंद्र गोरे यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, “शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्वरित दखल घेणे आवश्यक आहे. एकही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.”
शाळेत अद्याप पाठ्यपुस्तके न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अडथळे निर्माण होत असून, याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी स्थानिकांचीही मागणी आहे.


























