फलटण दि.२८| फलटण एस.टी. डेपोत असलेल्या बारामती स्टँडवरील उत्तर बाजूची संरक्षण भिंत एस.टी. बस मागे घेताना धडकून कोसळून पाच ते सहा महिने उलटले तरी ती अद्याप बांधण्यात आलेली नाही. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, सदरील भिंत तातडीने पुन्हा बांधण्यात यावी, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने आगार प्रमुख, फलटण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी बसस्थानकाबाहेर पडण्यासाठी एक गोलाकार गेट असून तेथे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खडी, कचरा व बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांसह वयोवृद्ध महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना याच मार्गाने जावे-येणे भाग पडत आहे. भिंत पडल्यामुळे अनेकांना चारीत पडून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.
तसेच, एस.टी. बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला व विद्यार्थिनींना टवाळखोरांच्या हावभावाचा सामना करावा लागत असून, पाकीटमार व भुरट्या चोरट्यांसाठी हा मार्ग सुरक्षित ठिकाण बनला आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत तातडीने उपाययोजना करून पडलेली भिंत पुन्हा उभारावी, अशी ठाम मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेने केली आहे.


























