फलटण (विंचुर्णी) दि.२६| “भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक बौद्ध उपासक-उपासिकांवर आहे. त्यासाठी धम्माचे काटेकोर पालन करून आचार-विचारांची अंमलबजावणी केली पाहिजे,” असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले. ते मौजे विंचूर्णी येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील दहावे पुष्प गुंफताना बोलत होते.
यावेळी प्रवचनात मोहिते यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी पंचशीलाचे पालन करून नीतिमान जीवन जगण्याचा संदेश दिला. “धम्म हा निर्मळ जीवनाचा मार्ग आहे. अंधश्रद्धा व कर्मकांड टाळून धम्म आचरणात आणल्यासच खरी प्रगती शक्य आहे, अन्यथा विनाश अटळ आहे,” असेही ते म्हणाले.
भारतीय बौद्ध महासभा शाखेचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी वर्षावासाचे महत्व समजावून सांगितले. तसेच कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे, संघटक आयु. विजयकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. विंचूर्णी गावातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फलटण तालुक्याचे भूषण, ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई आयु. तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक उपासक-उपासिकांना वितरित करण्यात आले. तसेच लहान मुलांना संविधान उद्देशिका व वंदना सूत्रपठन पुस्तिका देण्यात आल्या.


























