फलटण : शुक्रवार दि. ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात वहीतुला, खो-खो क्रीडांगण पूजन, वृक्षारोपण, बक्षीस वितरण, लकी ड्रॉ तसेच महिलांसाठी फनी गेम्स अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. शाळेत झालेल्या वहीतुला अंतर्गत जमा झालेल्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोजराज नाईक निंबाळकर (सदस्य, ग.कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी) होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर (व्हा. चेअरमन, स्कूल कमिटी), सौ. नुतन शिंदे, नितीन गांधी, चंद्रकांत पाटील, शिरीष भोसले, रणजित निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, अरविंद निकम (प्रशासन अधिकारी), सौ. खलाटे (मुख्याध्यापिका, श्रीमंत निर्मलादेवी बालक मंदिर), सौ. लोंढे मॅडम (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), सावंत सर (प्राचार्य, नर्सिंग कॉलेज), कुचेकर मॅडम (मुख्याध्यापक, श्रीमंत सगुणामाता प्राथमिक), रजपूत मॅडम (मुख्याध्यापक, मुधोजी बालक मंदिर) यांचा समावेश होता. तसेच ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, यशवंत खलाटे आणि श्री. माने उपस्थित होते.
शिक्षकांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्यासाठी तयार केलेली शुभेच्छांची “आमराई” विशेष आकर्षण ठरली. यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अल्पावधीत शाळेने केलेली गुणात्मक व संख्यात्मक प्रगती ही कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात भोजराज नाईक निंबाळकर यांनी“एकसष्टीप्रमाणेच बाबांच्या शताब्दी सोहळ्याचेही आपण साक्षीदार होऊ” अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. पालक आणि स्कूल कमिटी सदस्यांनी वहीदान करून वहीतुलामध्ये सक्रिय सहभाग घेतला.कार्यक्रमात पालक प्रतिनिधी आशा घाडगे व शिक्षक प्रतिनिधी श्री. चव्हाण यांनी शुभेच्छारूपी मनोगत व्यक्त केले. पालक व विद्यार्थ्यांनी केक कापून सामूहिक शुभेच्छा दिल्या.संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी सूत्रसंचालन सौ. रूपाली कदम यांनी केले तर आभार सौ. माधुरी काशीद यांनी व्यक्त केले.


























