फलटण, दि. १८ | महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “मा.वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५” यासाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे समितीने सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय सन्मान पटकावून हॅटट्रीक पूर्ण केली आहे.
समितीच्या संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते यांनी उपाध्यक्ष भगवानराव होळकर, संचालक मंडळ, सचिव व स्टाफ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला.
यापूर्वी समितीस महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग स्मार्ट पुरस्कारात जिल्ह्यात सलग तीनवेळा प्रथम क्रमांक, तसेच नवराष्ट्र – नवभारत टाइम्सचा सर्वश्रेष्ठ एपीएमसी पुरस्कारही मिळाले आहेत.
चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवले. शेतमालाला चांगला दर मिळवून देणे, ई-नाम ऑनलाईन कामकाज, वृक्षारोपण, पारदर्शक लेखापरीक्षण, तसेच सर्व सुविधा पुरविणे या निकषांवर फलटण बाजार समिती राज्यात अव्वल ठरली.
या यशाबद्दल मा. मंत्री जयकुमार रावल, मा.विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,मा आमदार दीपकराव चव्हाण, जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी समितीचे अभिनंदन केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “हा सन्मान हे संचालक मंडळ, सचिव, सर्व सहकारी स्टाफ आणि आवक आणणारे शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी यांचे संयुक्त यश आहे.”


























