पुणे भोर नसरापूर दि.१० |जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन या दुहेरी पर्वाचे औचित्य साधून शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने कातकरी वस्तीवर विशेष उपक्रम राबविण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ या देशभक्तिप्रेरक मोहिमेअंतर्गत वस्तीतील प्रत्येक घरात राष्ट्रीय ध्वज पोहोचविण्यात आला तसेच आदिवासी समाजातील नागु कातकरी यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध भूमिगत राहून आंदोलन केले. त्यांना ब्रिटिशांनी पकडून देहदंडाची शिक्षा दिली. त्यांच्या या हुतात्म्याचे स्मरण म्हणून तसेच स्वातंत्र्यलढ्यातील मोलाच्या योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. घाडगे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना सांगितले की, “भारत ७५ वर्षांचा स्वातंत्र्य प्रवास पूर्ण करत असताना देखील अनेक आदिवासी समाज घटक आजही शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण ही पहिली पायरी आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांना शाळा व महाविद्यालयात नियमित पाठवावे.” त्यांनी आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यात दाखविलेल्या शौर्य आणि त्यागाच्या उदाहरणांचा संदर्भ देत पुढील पिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात NSS स्वयंसेवकांनी वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला राष्ट्रीय ध्वज देऊन देशभक्तीचा संदेश दिला. त्याचबरोबर स्वच्छता, एकता आणि शैक्षणिक जागृतीचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमादरम्यान स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाला NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. जगदीश शेवते, प्रा जाधवर दयानंद, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. माऊली कोंडे, प्रा. महेश कोळपे, पत्रकार विशाल शिंदे , स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आयोजनामुळे वस्तीतील वातावरण देशभक्तीने भारावून गेले आणि शैक्षणिक जाणीवेचा नवा संदेश पोहोचला.























