पावसाळा सुरू होताच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यापैकी ‘डेंग्यू’ हा सर्वात धोकादायक आजार असून, तो ‘एडिस’ प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. डासांचा डंख छोटा असला तरी त्यापासून उद्भवणारे धोके गंभीर असतात. जनजागृतीसाठी दरवर्षी १० ऑगस्टला ‘डेंग्यू प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो.
डेंग्यूची लक्षणे :-तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या, पोटदुखी व त्वचेवर लाल चट्टे उठणे. ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आहेत.
डेंग्यूचा विषाणू ‘डेन व्हायरस’ म्हणून ओळखला जातो. ‘एडीस इजिप्ती’ आणि ‘एडीस एल्बोपिक्टस’ हे त्याचे प्रमुख प्रसारक आहेत. या डासांना वाघ डास म्हणूनही ओळखले जाते. साचलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती व वाढ होते. त्यामुळे अनावश्यक साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे. म्हणजेच घरातील सर्व भांडी व पाणी साठवण्याची उपकरणे मोकळी करून स्वच्छ धुवून एक दिवस कोरडी ठेवणे. यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रतिबंध होऊ शकतो.
डेंग्यू पासून बचावाचे उपाय :-
कुलर, बादल्या, टाक्या इत्यादींमध्ये साचलेले पाणी दर आठवड्याला बदलणे व पाणी झाकून ठेवणे.
हात-पाय झाकणारे कपडे घालणे व डासांपासून बचावाचे क्रीम वापरणे.रात्री झोपताना मच्छर दाणीचा वापर करणे.ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे.
डेंग्यू रुग्णाला डासांपासून सुरक्षित ठेवणे, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही. याची काळजी घेणे.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पावसाळ्यात घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून, साचलेले पाणी काढून टाकून, प्रतिबंधक उपाय म्हणून डेंग्यूचा फैलाव रोखावा.


























