दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, तत्कालीन सरपंच, संबंधित ग्रामसेवक तसेच शिपाई यांच्याविरोधात चौकशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी दिली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तक्रारीनुसार, सन २०१९ ते जून २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर विविध करांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे जमा झालेली रक्कम अधिकृत नोंदींमध्ये अथवा ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा करण्यात आली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
याशिवाय, कर वसुलीसाठी कथितपणे डुप्लिकेट पावती पुस्तकांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विविध विकासकामांच्या अंमलबजावणीत आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, अनेक ग्रामस्थांकडे संबंधित पावत्या उपलब्ध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाते नोंदी, पावती पुस्तके, खर्चाची कागदपत्रे तसेच विकासकामांशी संबंधित अभिलेख यांची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत आणखी काही गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला असून, ग्रामपंचायतीतील काही कर्मचाऱ्यांनी कथितपणे आर्थिक रक्कम स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या निधीचा अपहार झाला असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाला झालेल्या कथित आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने आधारकार्डातील जन्मतारखांमध्ये बदल करून सेवा मुदत वाढवून घेतल्याचा गंभीर आरोपही तक्रारदारांनी केला आहे. निवृत्तीची वेळ उलटून गेल्यानंतरही शासकीय अनुदानाचा लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होणे अपेक्षित असताना काही अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी इशारा देताना सांगितले की, या प्रकरणातील चौकशीला गती देऊन आठ दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई करण्यात आली नाही, तर ग्रामस्थांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे दालवडी ग्रामपंचायतीतील या कथित गैरव्यवहार प्रकरणाकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


























