सातारा, दि.३ :गृहिणी व तरुणांना शासनाच्या विविध योजनांतर्गत कर्ज मिळवण्यासाठी बँकांकडे जाताना सातत्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात, अपमानास्पद वागणूक केली जाते अशी तक्रार रिपब्लिकन पक्षाच्या युवक व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, एचडीएफसी, बडोदा बँक यांसह अनेक बँकांकडून गोरगरिबांच्या लहानमोठ्या कर्जांसाठी (दहा हजार, वीस हजार, पन्नास हजार ते एक लाख) देखील अडवणूक, टोलवाटोलवी व फसवणुकीचे प्रकार होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
महामंडळांच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कर्ज योजनांवर लाभार्थींना योग्य ती माहिती व सुविधा मिळत नाही. तर कधी कधी तरुण व गृहिणींना लज्जास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे छोट्या उद्योगासाठी कर्ज हवे असले तरी युवक व गृहिणी निराश होऊन बसतात, असे निवेदनात नमूद आहे.
या प्रकाराविरोधात लवकरच तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला.


























