बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
फलटण:दि३०| मौजे हिंगणगाव ता. फलटण जि. सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम 29 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. मात्र पारंपरिक पद्धतीला छेद देत काकडे कुटुंबियांनी बौद्ध धम्मातील विज्ञानवादी विचारांचा अंगीकार करून पर्यावरण संवर्धनासाठी नवा मार्ग स्वीकारला.
सामान्यतः मृत्यूनंतर अस्थी प्रवाही पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा रूढ आहे. परंतु भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी बौद्ध धम्मातील पर्यावरण रक्षणाचा दृष्टिकोन कुटुंबियांसमोर मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थी विसर्जन प्रवाही पाण्यात न करता त्या स्वतःच्या रानात मिसळून स्मृती प्रित्यर्थ बोधिवृक्ष पिंपळ व आंब्याची झाडे लावण्यात आली.
या उपक्रमामुळे केवळ दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींचा सन्मानच झाला नाही तर पर्यावरण संवर्धनाचा आदर्शही पुढे ठेवला गेला. हिंगणगावातील ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका तसेच नातेवाईक व आप्तेष्ठ यांनी या अभिनव निर्णयाचे स्वागत केले.
या वेळी बौद्धाचार्य मोहिते यांनी भगवान गौतम बुद्धांच्या धम्म विचारांवर आधारित उपदेश दिला. त्यांनी सांगितले की, “जग हे अनित्य आहे. आपल्या जिवलगांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण ही सर्वोत्तम पद्धत आहे. हा उपक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
या निर्णयात काकडे कुटुंबीयांचा मोठा सहभाग होता. यावेळी उपस्थित असलेल्या धीरज बजरंग काकडे, सूरज भीमराव काकडे, सागर जगदीश बागडे, ताराचंद बापूराव काकडे, अभिजीत प्रकाश कांबळे, गणेश संतोष जगताप, ॲड. सरेंद्र सरतापे, विशाल राजेश काकडे तसेच इतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणात सहभाग घेतला.
हा उपक्रम पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला असून, स्मृतीप्रीत्यर्थ करण्यासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


























