महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी फलटण तालुक्यातील धम्मबांधवांनी उपस्थित राहावे – महावीर भालेराव

फलटण, दि.१४| जागतिक बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या आणि भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेले बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक चळवळीला नवे बळ मिळवून देण्यासाठी तसेच महू जन्मभूमी व नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देशव्यापी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता संपूर्ण देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर, तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही हा मोर्चा धडकणार आहे.हा मोर्चा भंते अनागरिक धम्मपाल व रामास्वामी पेरियार यांच्या जयंती दिनानिमित्त आणि दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करीत असून त्यांनी यासंदर्भातील इंटरवेंशन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या चळवळीत बौद्ध महासभा, भिक्खू संघ, समता सैनिक दल, आंबेडकरी बहुजन समाजाच्या विविध संघटना एकत्रितपणे सहभागी होत आहेत.फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांनी आवाहन केले आहे की,हा अस्मितेचा व श्रद्धास्थानाच्या मुक्तीचा लढा आहे. त्यामुळे फलटण शहर व तालुक्यातील सर्व धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे
.


























