फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ५ व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र 2 पाच बत्ती चौक या शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, प्रतिनिधी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ५ व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र 2 येथे दि. १५ जून २०२६ रोजी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण पोलीस ठाण्याचे श्री. यादव सर तसेच वलेकर मॅडम उपस्थित होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. फराह इनामदार, मुख्याध्यापक श्री. काशीद सर, मुख्याध्यापक श्री अजित गायकवाड सर , सर्व सहशिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व स्वागतपर उपक्रमांद्वारे मनापासून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आपुलकीची व आनंददायी अनुभूती मिळावी यासाठी शाळेने विशेष नियोजन केले होते. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत होताच शाळेचा परिसर आनंदाने फुलून गेला.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली मोफत पाठ्यपुस्तके तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके आणि साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात आवश्यक शैक्षणिक साधनांसह होत असल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले.
यावेळी वलेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत “गुड टच” आणि “बॅड टच” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती विश्वासू व्यक्तींना द्यावी तसेच भीती न बाळगता योग्य वेळी मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा आणि स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, मन लावून अभ्यास करण्याचे तसेच चांगले संस्कार आणि शिस्त अंगीकारण्याचे आवाहन केले. शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याचे भक्कम साधन असून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा योग्य उपयोग करावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. काशीद सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात स्वागत, प्रेरणा आणि ज्ञानदानाच्या वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.


























