सातारा :दि.२७ | लहानग्या चिमुकल्यांच्या हातातली ओंजळ किती मोठं कार्य करू शकते, याचं जिवंत उदाहरण साताऱ्यात पाहायला मिळालं. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर येथील विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी तब्बल सहा पोती धान्य जमवून देऊन खऱ्या अर्थाने माणुसकीचा शिल्पकार होण्याचा धडा जगाला शिकवला.
त्यांच्या नाजूक बोटांतून पडलेला प्रत्येक धान्याचा दाणा जणू अश्रूंना आधार देणारा, उपाशी पोटीला भाकरी देणारा आणि निराधार लेकरांसाठी आईच्या उबेसारखा ठरला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उपजीविकेसाठी राबवलेला मुष्टिफंड हा उपक्रम फक्त इतिहासात वाचण्यापुरता राहिला नाही; तर आज त्यांच्या विचारांचा वारसा या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला.
शाळकरी वयातील या लेकरांना भाकरीचे महत्त्व काय, भूक किती वेदनादायी असते हे कदाचित समजत नसेल; पण “दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येऊ नये” ही संवेदनशीलता त्यांनी निरागस हृदयात रुजवली.
ही सहा पोती धान्य म्हणजे केवळ अन्नधान्य नाही, तर ती आहेत माऊलीच्या मायाळूपणाच्या सहा पोती, आशेच्या सहा पोती आणि जगण्याच्या उमेद देणाऱ्या सहा पोती.
यालाच म्हणतात – ‘रयत कल्चर’ –
ही संस्कृती फक्त बोलून किंवा लिहून नव्हे, तर अशा छोट्या-छोट्या पण मोलाच्या कृत्यांतून जिवंत ठेवायची असते… आणि ती आज या निरागस लेकरांनी जगाला दाखवून दिली.


























