समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | नवी दिल्ली | दि. ४ ऑगस्ट
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेती, सिंचन, सहकार, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि जनतेशी निगडित विविध विषयांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली. या भागातील प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारचे आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
राजकीय वर्तुळात या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात असून, आगामी काळातील विकासकामे आणि संघटनात्मक घडामोडींच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.


























