फलटणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
फलटण | प्रतिनिधी. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत. इंटरनेट केबल्सचे वीज खांबांवरून स्थलांतर सुरू असताना अनेक भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दिवसभरात अनेक वेळा वीज जाणे-येणे सुरू असल्यामुळे घरगुती कामे, उद्योग-व्यवसाय, ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात होणाऱ्या या वारंवारच्या वीज खंडितमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणच्या निर्देशानुसार वीज खांबांवरील इंटरनेट व केबल टीव्हीच्या केबल्स हटविण्याचे आणि इमारत ते इमारत नेटवर्क स्थलांतराचे काम सुरू असल्याने काही भागांत वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नागरिकांनी हे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी महावितरणकडे नियोजित वीज बंदबाबत पूर्वसूचना देणे, तातडीने बिघाड दूर करणे आणि भविष्यात वारंवार होणारे वीज खंडित टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


























